“सफरचंद” आता मराठी रंगभूमीवर
‘कोडमंत्र’ नाटकाच्य अभूतपूर्व यशानंतर गुजराती रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय झालेले “सफरजन” हे नाटक आता “सफरचंद” या नावाने मराठी रंगभूमीवर येत आहे. सरगम + अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाचा मुहूर्त नुकताच दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे पार पडला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते. निर्माते भरत नारायणदास ठक्कर यांनी आतापर्यंत अनेक गुजराती व मराठी नाटकाची निर्मिती केली आहे. त्यांच्या “कानजी विरुद्ध कानजी” या गुजराती नाटकाने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. “कोडमंत्र” या गुजराती नाटकाची निर्मितीही त्यांनीच केली होती. “कोडमंत्र” हे नाटक मराठीतही रूपांतरित करण्यात आले होते. हे नाटक गुजराती व मराठी रंगभूमीवरही प्रचंड गाजले होते. ‘कोडमंत्र’ या मराठी नाटकाची निर्मिती भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांनी एकत्रितपणे केली होती. आता हेच निर्माते ‘सफरजन” हे गुजराती नाटक आता “सफरचंद” या नावाने मराठी रंगभूमीवर घेऊन येत आहेत. “सफरचंद” या शीर्षकावरून लगेच काही अंदाज बांधता येत नाही, मात्र फळाच्या नावावरून नाटकाचं नाव म्हणजे नक्की काय आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली असणारच. लेखिका स्नेहा देसाई यांनी मुळ गुजराती नाटक ‘सफरजन’ चे लेखन केले असून त्याचे मराठीत रूपांतर मुग्धा गोडबोले यांनी केले आहे. अनेक सुपरहिट गुजराती नाटकाचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश जोशी “सफरचंद” या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. कोडमंत्र नंतर मराठीतले त्यांचे हे दुसरे नाटक आहे. ‘सफरचंद’ हे नाटक केवळ गुजरातीपुरते मर्यादित न ठेवता त्याचा मराठी रंगभूमीवरही रसिकांनी आनंद घ्यावा ह्या हेतूने त्यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले आहे.
“सफरचंद” ही एक हृदय पिळवटून टाकणारी आकर्षक मानवी कथा आहे. एक वेगळा विषय या नाटकात मांडला असून सर्वधर्म समभाव हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेवरील नाटक असल्यामुळे मराठी भाषेतही तितकेच प्रभावशाली ठरेल हया उद्देश्याने निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांनी याची निर्मिती केली आहे. भव्योदात्त विचार, जबरदस्त नाट्यानुभव, अचंबित करणारी देखणी नाट्यनिर्मिती, खुर्चीत खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि आवडत्या कलावंतांची मनमुराद अभिव्यक्ती अशा अनेकानेक गोष्टी एकाच वेळी या नाटकात जुळून आल्या असून प्रेक्षकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. फिरता रंगमंच, भव्य नेत्रसुखद नेपथ्य, त्या वातावरणाला साजेसं मधुर संगीत ही या नाटकाची उल्लेखनीय बाजू असणार आहे. या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, पार्श्वसंगीत सचिन जिगर, प्रकाशयोजना भौतेश व्यास यांची आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक नाटकाचे यशस्वीपणे व्यवस्थापन सांभाळणारे गोट्या सावंत हे या नाटकाचे सुत्रधार आहेत. यात शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येत आहे.